Subscribe Us

Header Ads

ब्रेकिंग न्यूज: शहरातील रस्ते घोटाळ्या प्रकरणी ९३० कागदोपत्री पुराव्यांसह किरण काळेंनी अँटी करप्शनकडे नोंदविला जबाब

 

तब्बल दोन तास चालली प्रक्रिया, घोटाळ्यातील सहभागींना फुटला घाम 


प्रतिनिधी : मागील सात ते आठ वर्षांमध्ये कोट्यावधी रुपये रस्त्यांच्या कामांसाठी महानगरपालिकेने खर्च केले. तरी देखील आजही शहर खड्ड्यां मध्येच आहे. मग जनतेचे हे कोट्यावधी रुपये गेले कुठे ? कोणी कोणी याचा मलिदा लाटला ? कोणी नगरकरांना खड्ड्यामध्ये घातले ? अशा अनेक प्रश्नांना आता वाचा फुटू लागली आहे. बहुचर्चित १५० कोटी रुपयांच्या शहर मनपाच्या रस्ते घोटाळ्या संदर्भात तक्रारदार शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांचा अँटी करप्शन कार्यालयाने जबाब नोंदविला आहे. सुमारे दोन तास ही प्रक्रिया सुरू होती. जबाबाच्या तपशिलाबाबत गोपनीयता बाळगण्यात आली आहे. काळे यांनी तब्बल ९३० कागदपत्रांचे पुरावे यावेळी अँटी करप्शन ब्यूरोचे पोलीस उपाधीक्षक अजित त्रिपूटे यांच्याकडे सुपूर्द केले आहेत. हा शहर मनपातील आजवरचा सर्वात मोठा महाघोटाळा असल्याचा दावा काळे यांनी जबाब नोंदवल्यानंतर माध्यमांशी बोलताना केला आहे. 

बुधवारी सायंकाळी उशिरापर्यंत काळे यांचा जबाब नोंदवण्याची प्रक्रिया टीव्ही सेंटर परिसरातील अँटी करप्शन कार्यालयात सुरू होती. काळे दुपारनंतर पुराव्यांसह कार्यालयात दाखल होताच त्याची बातमी शहरभर पसरली. नेमका काय जबाब नोंदविला जातो याबाबत कुजबुज सुरू झाली. माहिती अधिकारात मागील सुमारे दीड वर्षांपासून पाठपुरावा करत काळे यांनी अनेक पुरावे मिळविले आहेत. त्यातील काही पुरावे त्यांनी जबाब नोंदविताना सादर केले आहेत. 

याबाबत माहिती देताना किरण काळे म्हणाले की, जबाबाचा सविस्तर तपशील सार्वजनिक करणे योग्य नाही. मात्र काही गोष्टी जगजाहीर आहेत. त्याबद्दल बोलता येऊ शकते. माझ्याकडे याबाबत अजून महत्त्वपूर्ण पुरावे आहेत. योग्य वेळी ते देखील मी तपास यंत्रणेला सादर करणार आहे. दि. ८ मे २०२३ रोजी मी या गंभीर भ्रष्टाचाराबाबत महापालिकेकडे तक्रार केली होती. त्यानंतर १५ मे रोजी पहिले व २२ मे २०२३ रोजी दुसरे स्मरण पत्र दिले. त्यामध्ये मनपा तत्कालीन आयुक्त डॉ. पंकज जावळे यांना रस्त्यांच्या कामांमध्ये निकृष्ट कामे करून बनावट टेस्ट रिपोर्ट व थर्ड पार्टी बनावट रिपोर्ट जोडून घोटाळा करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली होती. अन्यथा छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीदिनी १ जून २०२३ रोजी जिल्हाधिकारी यांच्या दालना समोर आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. 

काळे पुढे म्हणाले, आत्मदहन करण्यापूर्वीच आदल्या रात्री पोलिसांनी मला व माझ्या काँग्रेस पक्षातील सहकाऱ्यांना सावेडीत पक्षाची बैठक सुरू असताना ताब्यात घेत तोफखाना पोलीस स्टेशन येथे नेले. त्यावेळी मनपा उपायुक्त व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी आयुक्तांच्या मान्यतेने ठोस कारवाईचे आश्वासन दिले होते. मात्र ते आश्वासन पाळले गेले नाही. हे सर्वश्रुत आहे की ज्या आयुक्तांनी भ्रष्टाचाऱ्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला तेच आयुक्त सध्या भ्रष्टाचाराच्या आरोपांमध्ये निलंबित आहेत. दुःखद बाब म्हणजे आयुक्त पंकज जावळे यांना या शहरामध्ये भ्रष्टाचार करण्यासाठीच लोकप्रतिनिधींनी शिफारस करून आणले होते की काय याबद्दलचा संशय आता गडद होत चालला आहे. 


ती ७७६ कामे अँटी करप्शनच्या रडावर 

महापालिका यंत्रणा, ठेकेदार यांनी राजकीय पुढाऱ्यांच्या वरदहस्थातून सुमारे ७७६ कामांमध्ये निकृष्ट कामे करत भ्रष्टाचार केला गेला असल्याचा जबाब किरण काळे यांनी नोंदवला आहे. त्यामुळे आता सन २०१६ ते सन २०२० या सुमारे चार वर्षांच्या कार्यकाळातील ती ७७६ कामे अँटीकरप्शनच्या रडारवर आली आहेत. एवढेच नव्हे तर सन २०२० ते २०२३ या कार्यकाळातील कामां बद्दल देखील काळे यांनी तक्रार केली आहे. गुन्ह्याची व्याप्ती यामुळे मोठी असण्याची दाट शक्यता आहे. 


घरकुल घोटाळ्याची आठवण 

यापूर्वी जळगावमध्ये मोठा घरकुल घोटाळा झाला होता. त्यामध्ये माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्यासह घोटाळ्यातील सहभागींना शिक्षा होत तुरुंगवास भोगावा लागला होता. किरण काळे यांच्या तक्रारीनंतर रस्ते घोटाळ्यातील सहभागींना चांगलाच घाम फुटला असून भविष्यात याबाबतचा सखोल तपास झाल्यानंतर या कटात सहभागी असणाऱ्या दोषींना तुरुंगाची हवा खावी लागणार आहे हे मात्र निश्चित आहे. 


काळे यांचे नागरिकांकडून स्वागत 

किरण काळे यांनी नगर शहरातील नागरिकांची जीवनवाहिनी असणाऱ्या रस्त्यांच्या प्रश्नावर घेतलेल्या आक्रमक भूमिका आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे उघडकीस आणलेल्या महाघोटाळ्या मुळे नगरकरांमध्ये पुढील काळात रस्त्यांच्या कामांमध्ये भ्रष्टाचाराला पाय बंद होईल अशी आशा निर्माण झाली आहे. त्यामुळे काळे यांच्या कामाचे नगरकरांकडून स्वागत व कौतुक होत आहे. 

मनपाने आमच्यावरच खोटे गुन्हे दाखल केले 

मागील काळात शहरातील जागोजागी पडलेल्या खड्ड्यां संदर्भात आणि रस्त्यांच्या निकृष्ट कामांवर आवाज उठविण्याकरता किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस कार्यकर्त्यांनी भव्य आसूड मोर्चा मनपावर नेला होता. यावेळी राजकीय दबावातून मनपा अधिकाऱ्यांनी काळे यांच्यासह सुमारे दहा ते पंधरा काँग्रेस कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले आहेत. किरण काळे म्हणाले की, आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला गेला. आजही आम्ही लोकांसाठी काढलेल्या मोर्चा मुळे दाखल झालेल्या खोट्या गुन्ह्यामुळे कोर्टात खेटा मारत आहोत. परंतु नगर शहरातील रस्ते चांगले व्हावेत यासाठी माझी फासावर देखील जाण्याची तयारी आहे. नाहक खोटे गुन्हे दाखल करत आम्हाला दाबण्याचा शहरातील एका बड्या राजकीय नेत्याचा तो अयशस्वी केविलवाणा प्रयत्न होता असे काळे यांनी म्हटले आहे. 

Post a Comment

0 Comments